Wednesday, September 06, 2006

भणाणता वारा. अखंड किनारा निर्मनुष्य. आम्ही सहा जण मोठ्यांदा बडबड करत आलोय.
वाऱ्याबरोबर लाटा कानावर आदळायला लागतात. एक-एक करत सगळेच आपसूक गप्प होत जातात. कातळांच्या बाह्याकृती तेवढ्या दिसतायत. आपल्याला हवी तशी जागा शोधायची धडपड सुरू. कुणाला बूड टेकेल इतपत जागा पुरते..कुणाला पाय पसरायला हवे असतात..कुणाला मागे रेलून बसायला दगड हवा असतो..कुणी पाय पसरून बसलेल्यालाच दगड मानून मोकळा होतो.
सगळे स्थिरस्थावर झाल्यावर बडबड पुन्हा सुरू. एक मुलगा बेंगलुरु चा रहिवासी - मग- 'रजनीकांत सिनेम्यां'तल्या विनोदांची उजळणी सुरू होते. "हीरोला तीन बाजूंनी तीन व्हीलन्सनी वेढलेलं. समोरच्याकडे मेज्जर चांगलं रिव्हॉल्वर. हीरोकडे एक चाकू फक्त. समोरून गोळी सुटते. इकडून चाकू सुटतो. रोंरावत जात बरोब्बर गोळीचा मध्यातून छेद घेतो. मग दोन बाजूच्या व्हीलन्स चा कारभार गोळीच्या दोन भागांनी आटपतो, आणि तो चाकू इमाने-इतबारे मधल्याचा कोथळा बाहेर काढतो आपोआप. :D " मग कुणाला कूटप्रश्न सुचतात..पोरं 'गनितवाली' असल्यामुळे 'You know you are a mathematician if...' वाले विनोद सुरू होतात.
इतक्यात कुणाचंतरी लक्ष दूरवर समुद्राच्या 'कोपऱ्यात' जातं. चांदीसारखा चमचमणारा एकच पट्टा..आणि तिथून खळाळत लाट पुढे येतेय चांदी लेवून. नजर वर वर उठत आकाशात जाते. अष्टमीचा चंद्र चांदणं सांडतोय बेगुमान. एक मोठ्ठा ढगोबा सरकत येतो..तोंड आ वासलेलं. राहूसारखा झटक्यात चंद्राला गिळंकृत करतो. पाणी पुन्हा काळंभोर. कातळांच्या मध्येच एक इवलंसं तळं बनलंय समुद्रात. चंद्र दोन मिनिटांत बाहेर येऊन तळ्यात डोकावतो. पाण्यात शेकडो इवल्या मासोळ्यांची चमचम! मग अजून ढग येत राहतात, रांगेनं पुढे सरकत राहतात. ढगांच्या पडद्यातला चंद्र विद्याधर गोखलेंच्या एका शेरातल्या रूपगर्वितेसारखा वागत राहतो :
"पर्दा उठाया, फ़िर गिराया, और फ़िर उठा दिये
..कि देखें, देखनेवालों में किनमें होश बाक़ी है" !

वारा वासरासारखा उधळलाय. शिरशिरी येऊच देत नाहिये..सरळ हुडहुडीच भरवू पाहतोय. मग मी 'वनवास' पुस्तकाच्या मुखपृष्ठावरल्या लंपन-आसनात बसते - दोन्ही पाय गुडघ्यात मुडपून अंगाजवळ धरत, त्यांना हातांचा घट्ट विळखा घालत. हळूच डोळे मिटून घेते. समुद्राचा गंभीर आवाज एक पार्श्वभूमी बनून राहिलाय सगळ्या 'असण्या'ची. एखादा होम चालू असेल तर गुरुजींच्या मंत्रोच्चारणाचा गंभीर आवाज घरभर भरून राहतो तसा. ईशावास्योपनिषद पाठ असतं तर ते म्हटलं असतं या लाटांच्या तालात.
पूर्णमद: पूर्णमिदम्‌ पूर्णात्‌ पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
... आता मात्र आतून शिरशिरी येते. आकाशाची पोकळी..अफाट समुद्र..पंचमहाभूतं.. उगीचच आपण तत्त्वज्ञ ऋषिमुनींच्या काळात पोहोचल्याचा भास होतो.
हळूच डोळे किलकिले करत समोर पाहते, तर मघाशी चंद्राला गिळलेल्या ढगात एक मुठीएवढालं भोक पडलेलं असतं, आणि "चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे"! चांदण्याचा कवडसा समुद्रात पडलेला. नेमके त्या तेवढ्या भागात छोट्या छोट्या कातळांचे उभे सुळके वर आलेले. जलपऱ्यांचा तलाव!! Lord of the Rings च्या जगातल्या चंदेरी पऱ्या त्या क्षणी तिथे उगवल्या असत्या तर मला जरासुद्धा आश्चर्य वाटलं नसतं.


'अबे! गिरा दी नीचे? अब कैसे निकलेगी?' ..जरा गलबला होतो. एका पोट्ट्याची चप्पल दगडांच्या कपारीतून खाली कुठेतरी पडलेली असते. मी परत 'नॉर्मल'ला येते. पटापट सगळ्यांचे भ्रमणध्वनी बाहेर येतात. 'पॉवरफुल टॉर्च' वाले लोक तीन-चार बाजूंनी प्रकाशझोत टाकून चप्पल शोधायचा प्रयत्न करतात..चप्पल काही पायाला लागत नाही.

आता त्या जागेचा 'मूड', 'चार्म' संपलेला असतो. दोन मिनिटं उगीच रेंगाळून मग सगळे उठतातच लगबगीनं: खऱ्या जगातलं स्वप्न सोडून स्वप्नांच्या जगातलं खरं बघायला!

(७ जुलै २००६.)

16 Comments:

गायत्री,

तू लिहिलयस म्हणजे वाचलंच पाहिजे :-)
तुझी शैली फार छान आहे..
असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात जडावाच्या दागिन्यांसारखे असतात नाही? ते क्षण सोनेरी असतात की त्या वयातले/त्या क्षणाचे आपण ... कोण जाणे..

इतिBlogger Raina
Wednesday, September 06, 2006 3:57:00 PM  

:)
- saksham

इतिAnonymous Anonymous
Wednesday, September 06, 2006 6:59:00 PM  

खूपच सुंदर.
कुठे गेला होतात नक्की?

इतिBlogger Kaustubh
Wednesday, September 06, 2006 7:38:00 PM  

वा गायत्री! बोट धरून घेऊन गेलीस तुझ्याबरोबर :-)

इतिBlogger Sumedha
Thursday, September 07, 2006 2:12:00 AM  

गायत्री,

मस्त! अगदी डोळ्यासमोर उभा राहिला तो माहोल!
समुद्र किनारा कोणता बरे? कातळ आहेत म्हणजे हरीहरेश्वर का?

-मंजिरी

इतिBlogger Manjiri
Thursday, September 07, 2006 11:21:00 AM  

varNan beShTach aahe. lampan-aasan tar ekdam tantotant. :)

इतिBlogger Nandan
Thursday, September 07, 2006 4:47:00 PM  

परत एकदा तो क्षण जगलो!

इतिBlogger Shashank Kanade
Thursday, September 07, 2006 7:19:00 PM  

धन्यवाद दोस्त्स!
मुंबईतला समुद्र होता तो..TIFR चा.

इतिBlogger Gayatri
Thursday, September 07, 2006 9:35:00 PM  

Nice article!. I haven't been to TIFR, but 'm tempting to go after reading this.

Dhananjay

इतिAnonymous Anonymous
Thursday, September 07, 2006 9:55:00 PM  

Amazing article Gayatri! I read it again n again. Chhan anubhav dilas.

इतिBlogger Tulip
Friday, September 08, 2006 11:02:00 AM  

Just superb!
khuupach suMdar varNan... shevaTachM vaakya tar apratim!

Lage raho.....

इतिBlogger गिरिराज
Friday, September 08, 2006 1:17:00 PM  

पर्दा उठाया, फ़िर गिराया, और फ़िर उठा दिये
..कि देखें, देखनेवालों में किनमें होश बाक़ी है" !


वाह!!! तुला हे त्यावेळी सुचणं ग्रेट. तुझ्या रसिकतेची दाद दिली पहिजे. बाकी लेख तर तूझे नेहमीच भारी असतात.

इतिBlogger abhijit
Wednesday, September 13, 2006 8:21:00 PM  

वाह! सुरेख लिहिलंय! छान वाटत होतं वाचताना. Good work indeed!
आणि हो, माझ्या ब्लॉगवरच्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. :)

इतिAnonymous Anonymous
Monday, October 09, 2006 11:51:00 PM  

aaj chouthyanda ki pachavyaanda vachala - amazing lihila aahes g.

इतिAnonymous Anonymous
Friday, October 13, 2006 12:02:00 PM  

Ten on Ten for 'Lampan Asan' :) TIFR is one of the best places to be at!

इतिBlogger Ojas
Saturday, October 21, 2006 2:56:00 AM  

ahaahaa, kasale sahee lihita ho tumhi! mi ekdam fida zaley tumchya lekhanavar!

इतिAnonymous Anonymous
Monday, October 23, 2006 10:10:00 PM  

Post a Comment

<< Home