Sunday, March 26, 2006

आजोबा

"अहो..ते बघा तिकडं..आपले गोटखिंडीकरच ना ते?"
"अगं हो. त्यांच्यात काय बघायचंय पण आता या वयात?"
"अहो तसं नाही! खांद्यावर बघा की त्यांच्या. नात झालीय ना पाच-सहा म्हयन्यांपूर्वी? तिला घेऊन फिरायला निघालेत बहुतेक. तुमचा जुना फ्यॅमिली फोटो आहे बघा - त्यात तुमच्या वडिलांनी उपरणं गळ्यात घालून त्याचा उजवीकडचा शेव डाव्या खांद्यावरून मागे टाकलाय किनै - तश्शी धरलीय तिला त्यांनी डाव्या खांद्यावर. ही कसली बाई नवीन स्टाईल? लेकराची मान-बीन मुरगळेल की. थांबा सांगतेच त्यांना.."
"अगं अगं पण.."
**

"काय हो हे भाऊसाहेब? "
"नमस्कार वहिनी. काय झालं हो?"
"अहो पोरीला जरा नीट घ्या की कडेवर. हे काय धोतराच्या पिळ्यासारखं खांद्यावर टाकून चाललाय?"
"अहो मी लाख घेईन हो नीट. पण या भवानीला असंच निवांत पडून राहायला आवडतं त्याचं काय? जरा हातांवर घ्यायचा अवकाश, की निषेधात्मक आवाज सुरू करते. आणि इकडे लोकांच्या 'काय चमत्कारिक म्हातारा आहे' अशा नजरा टाळताना मला नको जीव होतो!"
"अहो त्या सहा पौंडी जिवाला काय कळतंय स्वत:चं बरं वाईट? जरा रडू दे रडली तर. मान सावरता येत नसेल अजून..लचकली म्हणजे केवढ्याला पडायचं!"

भाऊंनी दचकून सायलीला मोठ्या निर्धारानं नीट कडेवर घेतलं. ती बया पण आता मूठ चोखत शांतपणे इकडे-तिकडे बघत, वहिनींकडे बघून निवांत हसली. भाऊंना अस्सा राग आला... 'नेहमी लोकासमोर हसं करते माझं कारटी.'
वहिनींनी आपला जय झाल्याच्या आनंदात सायलीशी चुटक्या-बिटक्या वाजवून, तिला 'हुश्शाल आहे हो आमची शायली' (स्वगत: आजोबांसारखी नाही..) वगैरे सर्टफिकेट देऊन सलगी प्रस्थापित केली.
भाऊंनी वरवर हसत मनातल्या मनात आणेकर वहिनींना शत्रुपक्षाच्या सेनानीचं पद बहाल करून टाकलं. त्यांच्यावर 'म्हणे रडली तर रडू दे..काही दयामाया आहे की नाही? स्वत:च्या खंडीभर नातवंडांना असंच वाढवलं असणार!' असं तीव्र शरसंधान मनातल्या मनात करताना घर कधी आलं त्यांना कळलंसुद्धा नाही.
**

फाटकाची कडी उघडायला जाणार तेवढ्यात सायलीबाई खांद्यावर गाढ झोपून गेल्याचं भाऊंच्या लक्षात आलं. कुठेही आणि कधीही असं निर्धास्तपणे झोपता येण्याच्या तिच्या क्षमतेचा त्यांना भारी हेवा वाटायचा.पण आता एक नवीच अडचण त्यांच्या ध्यानात आली. एका हातात हे गाठोडं, दुसऱ्या हातात छडी, मग बंगल्याचं ते प्रचंड फाटक उघडायला तिसरा हात कुठला आणायचा?
बरं छडी बाजूला ठेवून एका हाताने फाटक उघडलं तरी त्या हालचालींनी, आवाजाने बाईसाहेब उठून भोकाड कशावरून पसरणार नाहीत? 'अगतिक' का काय म्हणतात तशा पद्धतीने त्यांनी कुजबुजत्या आवाजात माईंना, क्षिप्राला हाका मारण्याचे निष्फळ प्रयत्न केले. अर्थातच ते कुकरच्या शिट्ट्या, भांड्यांची पडापड या सकाळच्या नित्यपाठातून त्या दोघींनाही ऐकू आले नाहीत. मग छडी, सायली आणि कामवाल्या मावशी येईपर्यंत दारासमोर फेऱ्या मारणं, या तीन गोष्टींखेरीज भाऊंच्या हातात काहीच उरलं नाही.
**

एवढं झालं तरी सायलीवर आपल्याला चिडता का येत नाहिये, हे भाऊंच्या ध्यानात येईना. खरं म्हणजे खडकवासल्यातल्या कारखान्यात पर्यवेक्षकाचं काम करताना त्यांचं म्हणजे 'गोटखिंडीकर साहेबांचं' काम म्ह्टलं की अट्ट्ल कामचुकार सावजी सुद्धा श्रमपूजकाच्या भूमिकेत शिरायचा.हो! उगीच वाघाच्या जबड्यात कशाला मान द्या?
घरात सुद्धा माई आणि प्रकाश, विकास, मेधा त्यांना घाबरूनच असायचे. लग्न होऊन क्षिप्रा घरात यायला आणि ते सेवानिवृत्त व्हायला एकच गाठ पडली. आता ते जरा मवाळले, पण पूर्वीची जरब बऱ्याच अंशी कायम होती. 'या सगळ्याला सुरुंग लावला त्या कार्टीनं..' भाऊंना वाटलं. कारण सायली आल्यापासून तीच घराची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली होती.'सायली उठली का? तिची आंघोळ आधी होऊ दे. जरा हळू बोला, ती उठेल. अग्गं बाई, भिजवलान वाटतं शर्ट? व्हायचंच हो असं..जा पटकन बदलून या. आता मी कुठून देऊ आणखीन? घाला हो तुम्हीच कुठलातरी शोधून. मला सायलीकडे नको का पहायला? आणि हो, उद्यापासून सकाळ-संध्याकाळ फिरायला जाताना तिला सोबत घेऊन जा हं...'
"भाऊ म्हणे आता । उरलो फेरफटक्यापुरता ॥" अशी 'अभंग-रिमिक्स' ओळदेखील त्यांच्या मनात तरळून गेली.

"या सगळ्याचा तिला जाब विचारलाच पाहिजे. जरा डोळे मोठे केले तर लागेल घाबरायला आपल्याला हीसुद्धा.." लगबगीनं उठून भाऊ सायलीच्या पाळण्याकडे गेले. सारखं सारखं पाळण्यावरच्या त्या कापडी चिमण्यांकडे बघून ती कंटाळली असावी. पाळण्यावर हळूच झुकलेल्या भाऊंच्या चेहऱ्याकडे पाहिलं मात्र, आणि ती एकदम खिदळली.आनंदाचे चीत्कार काढत तिनं आपले हात त्यांच्या दिशेला झेपावले. आपल्याला पाहून कुणाला एवढा आनंद होऊ शकतो, ही गोष्ट भाऊ नाही म्हटलं तरी इतक्या वर्षांत विसरलेच होते. सायलीला उचलून भूऽर घेऊन जाताना, मघाच्या 'तिच्यावर आपल्याला चिडता का येत नाही' या प्रश्नाचं उत्तर त्यांना आपोआप मिळालं होतं!

**

बकुळीचं फूल जसं अलगद पानावर विसावतं,
तशा विश्वासानं आपलं इवलं बोट माझ्या तळहातावर ठेवलंस...
त्या क्षणापासून माझा निबर हात
मखमालीहून कोमल झाला
थकल्या-भागल्या, सुरकुतल्या त्याच्या त्वचेवर
दुधावरल्या सायीचा तजेला आला
तुझी नवथर जुई
आणि माझा विरक्ती प्राजक्त -
गळून पडताना तुला नवी प्रकाशज्योत देऊन गेला!

7 Comments:

गायत्री,तू नेहेमीच ज़बरी लिहितेस!
हेही भयंकर मस्त! :)

इतिBlogger गिरिराज
Saturday, April 15, 2006 12:13:00 PM  

^:)^

बाकी काहीच बोलायची गरज नाहीये.

इतिBlogger Kaustubh
Sunday, April 16, 2006 10:59:00 PM  

too good!

इतिBlogger Sumedha
Sunday, April 16, 2006 11:19:00 PM  

Great, dont know how I missed it so far.

इतिBlogger Nandan
Tuesday, April 18, 2006 10:51:00 PM  

pleased to get the appreciation giriraj,kaustubh,sumedha and nandan.
The poem's 3 years elder to the story, :) but thought it'd fit well in there..

इतिBlogger Gayatri
Tuesday, April 18, 2006 11:11:00 PM  

too good gayatri :)

इतिBlogger Abhi
Friday, May 05, 2006 5:29:00 PM  

Gayatri

Sunder post.

Tujhi 2-3 posts wachali gelya ardhya taasat!

WeL chhaan gelaach paN me marathi pustake baryaach divasaat vachali nasalyachi aathawan deun gelaa!

Aata hya suTTihun parat UK la jatana tujhya recommendations madhali na vachaleli gheun jaaNar!

Aani ho - aajoba post war comment deNyache mookhya kaaraN mhaNaje mala swat:la nukatich mulgee zaali tevaa tilaa vaDhawatana me swat: hyaa sagaLyatun geloye! Chhan shabdarup dilayes aajoba/aai/vaDilanchya anubhavanna!

Keep writing!

Himanshu.

इतिBlogger himan8pd
Friday, October 20, 2006 11:26:00 AM  

Post a Comment

<< Home