Sunday, February 26, 2006

कैवल्याचा पुतळा

'अंतर्नाद' च्या दिवाळी २००५ मध्ये अनिल अवचटांचा संतवाङ्मयाकडे 'जीवनविषयक, सुबोध तत्त्वज्ञान' अशा दृष्टीने पाहणारा "ज्ञानेश्वर, कबीर, सॉक्रेटिस वगैरे" हा लेख प्रसिद्ध झालाय. त्या लेखातला ज्ञानेश्वरांबद्दलचा हा भाग.
**

'मुक्तांगण' मध्ये 'अंतर्दीप' या कार्यक्रमात सुनंदा यशोला 'पसायदान' म्हणायला सांगायची. यशोला ते चालीवर म्हणायला शिकवलेलं. यशो मनापासून गायची. त्याचा अर्थ साधारण माहीत होता. मी एकदा सार्थ ज्ञानेश्वरी काढून पाहिलाही होता. तो समजला होता, पण उमगला मात्र अशाच एका बुधवारच्या अंतर्दीपमध्ये.
माझ्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वर नावाचा वीसपंचवीस वर्षांचा तरुण मुलगाच आला. सिनेमापासून पागोटं घालून कंबरेवर हात ठेवून उघडे बसलेले ज्ञानेश्वर मला अजिबात पसंत पडलेले नाहीत. मग हा ज्ञानोबा कसा होता? पंचा नेसलेला आणि उघड्या अंगावर तसाच पंचा पांघरलेला? हां, हे बरोबर जमतंय. हा मुलगा गोरापान असेल का? तसंही नको वाटतं. तो सावळाच असणार. नाकी, डोळी चारचौघांसारखा. बघता बघता मनानं तयार केलेले ज्ञानेश्वर दिसलेच.त्यंचे डोळे खूप बोलके होते. त्यात त्यांच्या अंतर्यामीची शांतता दिसत होती. एवढी मोठी ग्रंथरचना करून तो गुरूकडे, देवाकडे काहीतरी मागत होता. मोक्ष? नाही. ' विश्व स्वधर्मसूर्ये पाहो'. एका पैठण, आळंदीच्या पोराच्या तोंडी हे विश्व कोठून आलं? त्याला मागायला मिळालंच आहे, तर मागतोय काय? तर 'जो जे वांछील तो ते लाहो' आणि फक्त माणसांनाच नव्हे, तर 'प्राणिजात'. दुष्टांचं निर्दालन करणारे तर अनेक योद्धे होऊन गेले, पण दुष्टांमधली दुष्टता निघून जावो, असं मागणारा हा तेव्हाचा एकमेव वीर असेल. एक वीस-पंचवीस वर्षांचा, निर्धन मुलगा, अशा सहृदयतेनं वागणाऱ्या माणसांना तो 'कल्पतरू' म्हणतो आणि त्याचे आरव किंवा राई बनू दे असं मागतो. किती छान.

मलाही अलीकडं तसंच वाटू लागलं होतं. समाजातले मोठ्ठे मोठ्ठे प्रश्न कसे सोडवणार, याचा विचार जन्माचाच मागं लागलाय.ते प्रश्न सोडवायला जे करायचे ते करूच, पण आपल्या हातात असलेली गोष्ट आपण आधी करू, की आपण चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करू. ते पाहून इतरांनाही तसं राहायचा हुरूप येईल. आणि हळूहळू चांगल्या माणसांचा समूह तयार होईल. समस्यांच्यापुढं डोकं आपटून निराश होण्यापेक्षा, हे आपण करू, असं अलीकडं प्रकर्षानं वाटू लागलं होतं. ज्ञानेश्वर अकराशे की बाराशे कितीतरी सालात तेच सांगून गेलेत की. किती कोवळा मुलगा! किती नेमकं सांगितलं! आणि काम झाल्यावर झटकन निघून गेलाही! त्यांनी भिंत चालवली का नाही? त्यांनी जिवंत समाधी घेतली की नाही? यावर ज्यांना करायच्यायत चर्चा, त्यांना करू द्या. आज माझ्यासमोर उभा होता, पंचा नेसलेला आणि पांघरलेला, एक तेजस्वी डोळ्यांचा, खूप खूप पुढचं पाहणारा आणी मोठ्ठ्या मनाचा तरुण मुलगा. त्यानं असा मोठा ग्रंथ लिहिला, की या भाषेचा पायाच घातला गेला. आणि आज ज्या भाषेत मी लिहितोय, ती भाषा त्यानं समृद्ध करून हातात ठेवली. कितीतरी त्यांची उदाहरणं आपण आजही वापरतो. मान्य आहे, राजहंस डौलात चालतो, पण म्हणून आम्ही चालायचंच नाही की काय, हे वाक्य किती उभारी देणारं.

...'मुक्तांगण' मध्ये पसायदान ऐकताना मन भरून येतं. इतक्या वेळा ऐकूनही. ते त्या पंचविशीतल्या पोरानं आपल्याला दिलेलं स्वप्न आहे. सद्भावाच्या बीजापासून वाढलेल्या झाडांचं, 'कल्पतरूंचं आरव' होईल आणि ते इतरांना सावली देईल, ते वाढत, विस्तारत राहील. त्यात ओरबाडणं असणार नाही, उलट, देणं हा स्वभावधर्म असेल. त्या झाडांच्या आधारानं वेली वर चढतील. किडे, मुंग्या, सूक्ष्म जीव, पक्षी, प्राणी जगतील. वार्धक्यामुळं त्यातलं एखादं झाड पडलं, तरी ते तिथंच कुजेल, त्यावर नवी रोपं उगवतील...कोणी म्हणेल, " हा स्वप्नाळूपणा आहे." मान्यच आहे. पण हे स्वप्न कोणी दिलंय, माहीत आहे का?
त्या पंचाधारी, मायाळू डोळ्यांच्या, पंचविशीतल्या अनासक्त मुलानं!

***


गोड आहे किनई? एक लहानसा मुद्दा अजून सांगायचा होता, 'जे खळांची..' या ओवीबद्दल. प्रा. राम शेवाळकरांच्या भाषणांच्या ध्वनिफिती आहेत - बहुधा 'अलूरकर' च्या. त्यांपैकी 'योगेश्वर कृष्ण' आणि 'ज्ञानेश्वर' यांच्यावरची व्याख्यानं विशेष जमून आली आहेत. आणि लताबाईंनी 'मोगरा फुलला' नावानी आलेल्या ध्वनिफितीमध्ये ज्ञानियांच्या राजाचे अभंग, गायले आहेत. त्यातही डॉ. शेवाळकरांचं निवेदन आहे. तर या दोन्हींपैकी एका ध्वनिफितीत (मला वाटतं दुसऱ्या) पसायदानातल्या

जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडों, मैत्र जीवांचे।

या ओवीवर निरूपण आहे. त्यात या 'सत्कर्मी रतिं वाढो' चा सूक्ष्म अर्थ ( 'subtle meaning' ला हेच प्रतिशब्द योग्य आहेत ना?) फार छान सांगितलाय त्यांनी. "ज्ञानेश्वर किती उदार हृदयाचे होते पहा. खलप्रवृत्तीच्या लोकांची सत्कर्मामध्ये रती 'वाढो' असं म्हणतात ते; 'तयां सत्कर्मी रति लाभो' असं नाही! म्हणजे दुर्जनांनाही सत्कर्म करणे मूलत: आवडतेच..ज्ञानोबा मागतात की त्यांना ते अधिक आवडायला लागो."

किती साजरा दृष्टिकोन!

Saturday, February 25, 2006

ग़ज़ल

गेल्या काही महिन्यांपासून या काव्यप्रकाराने मला भलतंच वेड लावलंय. अर्थात गाणं ऐकताना देखील सुरांपेक्षा त्यातल्या शब्दांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या मला ग़ज़लेची संकल्पना आवडली नसती तरच नवल. या बेहद्द सुंदर काव्यप्रकाराची, मुख्यत: त्याच्या व्याकरणाची ओळख झाली ती "what is a ghazal" या अभय अवचट यांच्या लेखातून. मग नुकतीच मनोगत वर प्रत्यक्ष सुरेश भटांनी लिहिलेली ही लेखमाला वाचली, आणि ग़ज़लेचं सौष्ठव नव्या रूपात नजरेसमोर आलं. या वृत्तात लिहिणं हे येरागबाळ्याचं काम नाही, हे जाणवलं.
पर्शियन भाषेत ग़ज़ला म्हणजे 'हरीण'. डॉ. रघुपतिसहाय फ़िराक़ गोरखपुरी यांच्या लिखाणात ग़ज़लेची एक अतिसुंदर, हळवी व्याख्या आहे म्हणे: "पारधी मागे लागल्यामुळे प्राण वाचविण्यासाठी एक हरीण रानात सैरावैरा दौडतो आहे. पळता पळता दुर्दैवाने त्याची शिंगे झाडांच्या फांद्यांमध्ये अडकतात. अशा अवस्थेत ते बिचारे मोठ्या कष्टाने नजर तिरकी करून मागे पाहते, तो पारधी अगदी जवळ येऊन ठेपलेला असतो. आता साक्षात मृत्यूच डोळ्यांसमोर दिसत असताना त्या असहाय्य हरिणाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागतात. त्या अश्रूंना लाभलेले शब्दरूप किंवा त्या क्षणी त्या ग़ज़ालाच्या मुखातून उमटलेली आर्तवाणी म्हणजेच ग़ज़ल!"
आता इतक्या तरल व्याख्येला जागायचं तर कुणी म्हटलंय तसं
"अपना लहू, तेरी ताऱीकी (तेज), रानाई (कृष्णवर्ण) इस दुनिया की"
असे सारे रंग जवळ घेऊन बसावं लागत असणारच ग़ज़ल लिहिताना.
त्यामुळे ग़ज़लसदृश काहीही खरडताना 'अव्यापारेषु व्यापार' करत असल्याची जाणीव असते, आणि 'ग़ज़लेचे बरेचसे लिखित/ अलिखित नियम पाळणारं' काहीतरी लिहिता आलं तर छान, इतकीच अस्मादिकांची स्वत:कडून माफक अपेक्षा असते!

हां, तर आज डोक्यात असा विचार घोळू लागला, की आशिक़ीवाल्या ग़ज़ला या खूपदा 'तो'च का म्हणतो 'तिला' उद्देशून? आता असं म्हणतात की उत्कृष्ट प्रेमग़ज़लेच्या निकषांपैकी एक म्हणजे ती ग़ज़ल प्रेयसी आणि परमेश्वर या दोघांनाही एकसमयावच्छेदेकरून लागू होते. तशीच ती "प्रियकर किंवा परमेश्वर" अशी दुहेरी का नसावी? आपल्याकडे तर आहेतच मीरेच्या "एरी मैं तो प्रेमदिवानी" सारख्या रचना! मग 'शायर' सारखी 'शायरा' का नसावी? तिनी आपल्या 'साक्या' ला उद्देशून काही का न म्हणावं?
मग केवळ त्या हट्टाखातर एक ग़ज़ल 'पाडायची' ठरवली. (क्षमस्व, क्षमस्व!) पण गंमत अशी, की अख्ख्या ग़ज़लेत एकच लिंगसूचक क्रियापद उगवलं, आणि ग़ज़ल पुन्हा वाचताना अगदी न राहवून मी ते पुल्लिंगी बनवून टाकलं.
असो... पण कधीतरी मी स्त्रीवादी भूमिकेतून ग़ज़ल लिहिणारच आहे !

(आजची ग़ज़ल अशी होती :

हृदयात ध्यास आहे नयनांत आस आहे
नि:श्वास होत जातो प्रत्येक श्वास आहे

पाहून पायवाट, म्हणतो मनास मीही
दोघांस चालण्याला दिसते झकास आहे

ही वाट देखणी अन छायेत नाहलेली
पण ऊन कोण कुठले लागे मनास आहे

वृक्षास जेथ हलके बिलगून वेल दिसते
थबकून पाय तेथे, थोडा उदास आहे

घुमवीत सूर रानी कुणी पाखरू दिवाणे
त्यांचीच चाल आता या मन-रथास आहे!
)

Friday, February 24, 2006

काटे..सावर!



जेव्हा कवितावजा लिखाणात आगगाडीच्या डब्यांसारखी शब्दांची रांग लागते, आणि आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते आपण कागदावर उतरवलंय का असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा त्या लिखाणाला कविता - वजा म्हणावे काय? :D

Wednesday, February 22, 2006

नमो नम:|


आजच मराठी blogs विषयी साद्यंत माहिती देणारं हे उच्च संकेतस्थळ सापडलं : मराठी ब्लॉग विश्व
ते सापडायला कारणीभूत बहुधा e-sakal चा blog. (या 'blog' ला मराठी प्रतिशब्द काय असावा बरं? "आंतरजालनोंदवही"? ही ही! On a serious note, 'मुक्तालेख' हा शब्द सुचतोय या क्षणी..)
अस्मादिक तातडीने प्रभावित झाले नसतील तरच नवल! लगेच उचलली बोटे आणि लावली कळफलकाला.

शुभारंभाची ही गझल. मला स्वत:लाच खूप आवडल्येय.कल्पना तशी २-३ महिन्यांपूर्वी सुचली होती. नीट शब्द आज गवसले.